Shri Swami Samarth “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” हे वाक्य ऐकताच आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची आठवण होते. श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे बराच काळ त्यांनी वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रय यांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे.
श्री स्वामी समर्थ Shri Swami Samarth
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ यांच्या रुपाने प्रगट झाले. मी नुर्सिंह महान असून श्री शैल्यम जवळील कर्दळीवनात ना आलो आहे. हे स्वामीच्या तोंडाचे उद्गार त्यांनी स्वतः नरसिंह सरस्वतीचे अवतार असल्याचे सांगितले. श्री स्वामी समर्थांविषय माहिती पाहूया.
स्वामीचा अक्कलकोट प्रवेश
सन 1856 मध्ये महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरात गेले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे 14 व्या शतकात त्यांचा जन्म झाला.
त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन 1378 ते 1458 हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. सन 1457 च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300-350 वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात.
श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे.
श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत असत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले. त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते.
चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.
अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ जेव्हा प्रगट झाले तेव्हा ते प्रथम खंडेरायाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. “आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन,” असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्य श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही स्वामींनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता.
तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले.
त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाला. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज, श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
स्वामींची कृपा
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, आपण स्वामींची इतकी सेवा केली, तरी महाराज अजून का प्रसन्न होत्त नाहीत? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख-संकटे एकामागून-एक येतच राहिली, तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दु:खे का? इतके नामस्मरण केले, तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी-कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रारब्धभोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे.
आपले स्वामी तर इतके कनवालू-दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. दु:ख-संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एका गोष्टीमुळे होत राहते.
समाधी
श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा ह्यांचा घरात आहे. हे ठिकाण समाधीमठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे घोष वाक्य श्री स्वामी सामार्थांचेच आहे. Shri Swami Samarth श्री स्वामी समर्थ माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
II श्री स्वामी समर्थ II
खूपच सुंदर माहिती आहे कारण मला स्वामींवर शॉर्टफिल्म आणि स्वामींच्या कथा लवकरच यूट्यूब चैनल वर आणायचे आहेत कारण ग्रामीण भागात स्वामी कार्याविषयी मराठीत सांगणं थोडं जिकिरीचे होत आहे म्हणून त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते त्यामुळे आदिवासी भाषेतून स्वामी कार्य व्हावं यासाठी प्रयत्न चालले आहेत खूपच सुंदर माहिती धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏